रत्नागिरी – शिवचरित्र राज्यातील प्रत्येक युवकास माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने व्याख्यानमाला स्पर्धा घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
उच्च तंत्रशिक्षण विभागातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. नितीन बानगुडे-पाटील उपस्थित होते.
सामंत म्हणाले, राज्यात वक्तृत्वातून देखील विकास शक्य आहे याची ओळख प्रा. बानगुडे यांच्या वक्तृत्वशैलीतून होते. अशीच परंपरा पुढेही चालू राहिली पाहिजे. याचसाठी राज्यात 13 विद्यापीठात अशी स्पर्धा सुरु करण्यात येत आहे.
याप्रसंगी प्रा. बानगुडे यांनी शिवचरित्र विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्दकौशल्य, गनिमी कावा तसेच सांस्कृतिक पुढाकार, त्यांची आरमाराची दूरदृष्टी यावर आपल्या खास शैलीत शिवचरित्र उलगडून दाखवले.
शिवाजी महाराज त्यांच्या काळात जगातले सर्वोत्तम सेनापती होते आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय चारित्र्याची माणसे घडविली, असे प्रा. बानगुडे म्हणाले.