पिंपरी – शहरामध्ये सध्या दररोज सरासरी 15 टक्के इतकी पाण्याची गळती होत आहे. सध्या दररोज करण्यात येणारा 500 एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणीपुरवठा लक्षात घेता त्या तुलनेत हे प्रमाण 75 एमएलडी इतके आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या तसेच नागरिकांनी घेतलेले खासगी नळजोड, त्याला जोडलेल्या जलवाहिन्या आदींच्या माध्यमातून ही पाणी गळती होत आहे. हे वाया जाणारे पाणी वाचविल्यास शहरातील काही भागामध्ये अधिकचे पाणी देणे महापालिकेला शक्य होणार आहे.
शहरामध्ये सध्या दररोज 500 दशलक्ष लिटर इतके पाणी पुरविण्यात येत आहे. हे पाणी नियोजन करून विभागनिहाय दिवसाआड दिले जात आहे. त्याशिवाय, एमआयडीसीकडून देखील दररोज 30 दशलक्ष लिटर पाणी देण्यात येत आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या 500 दशलक्ष लिटर पाण्यापैकी किमान 15 टक्के पाण्याची गळती होत आहे.
35 टक्के पाण्यापासून उत्पन्न नाही
शहरामध्ये करण्यात येणाऱ्या एकूण पाणी वाटपापैकी सरासरी 35 टक्के पाणी “नॉन रेव्हेन्यू वॉटर’ आहे, म्हणजे या पाण्यापासून पाणीपट्टीचे उत्पन्न मिळत नाही. गळती, अनधिकृत नळजोड, झोपडपट्ट्यांतील नळजोड आणि महापालिका इमारतींसाठी देण्यात येणारे पाणी आदी कारणांमुळे या पाण्यातून महापालिकेला उत्पन्न मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात सध्या 1 लाख 60 हजार इतके अधिकृत नळजोड आहेत. महापालिकेला सध्या सरासरी वार्षिक 80 ते 90 कोटी रुपये इतके उत्पन्न पाणीपट्टीतून मिळत आहे. महापालिकेचे बुडणारे 35 टक्के पाणीपट्टीचे उत्पन्न वाढल्यास पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नात भर पडू शकते.
गळतीद्वारे वाया जाणारे पाणी रोखण्यात यश आल्यानंतर अधिकचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी शहरातील 60 टक्के भागातील जलवाहिन्या अमृत योजनेत बदलण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या वैयक्तिक नळजोडासाठी एमडीपीई पाइप टाकण्यात येत आहे. त्या माध्यमातून पाणी गळती रोखण्यास मदत होत आहे. शहरात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू झाल्यास पाणी गळतीचे प्रमाण कमी होईल. मात्र, त्यासाठी मुबलक पाणी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणारे पाणी नागरिकांनी जपुन वापरण्याची गरज आहे.
– अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.