श्रीकांत कात्रे
सातारा -पूर नियंत्रणासाठी पावसाळ्यात धोम, कोयना, वारणा व इतर धरणांचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन सांगलीत सोमवारी (दि. 11) झालेल्या बैठकीत करण्यात आले. करोना विषाणूविरुद्ध संघर्ष सुरू असतानाही सांगली जिल्ह्यातील नेते व लोकप्रतिनिधींनी पूर नियंत्रणासंदर्भात बैठक घेऊन दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे ठरविले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील नेते आणि लोकप्रतिनिधी अजूनही पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेलेच आहेत. काही अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करोनाच्या लढाईतही दिसत नाहीत आणि भविष्यातील पाण्याच्या नियोजनाचीही त्यांना चिंता नाही, हे चित्र खेदजनक आहे.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार पूर नियंत्रणासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज असून कोयनेसह अन्य धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. या पाण्यातून तेथील तलाव आणि बंधारे भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने मोठे नुकसान झाले. त्यामुळे संभाव्य पुराचा धोका ओळखून पूर नियंत्रण यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यातील कोयनेसह अन्य धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
यावर्षीही चांगला पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून या धरणांमधील पाणीसाठा कमी करण्यात येणार आहे. कोयना, वारणा, धोम, कण्हेर या धरणांचे पाणी सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या धरणांमधील 4 ते 5 टीएमसी पाण्यातून छोटे-मोठे तलाव भरण्यात येणार आहेत. या बैठकीस सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सध्याच्या दुष्काळी स्थितीबद्दल येथील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. भविष्यातील टंचाई आणि पाणीप्रश्नाबाबत चिंता करण्याचे कारणच नाही, अशा थाटात ते वावरत असावेत. सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतर जिल्ह्यांनी नेण्याचा प्रयोग काही नवा नाही. पूर्वीही याच पद्धतीने पाणी गेले आहे. आताही त्याच पद्धतीने जाणार आहे. पूर नियंत्रणाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दुष्काळी भागाचा विचार करून पाणी साठवून ठेवण्याचे नियोजन केले आहे, ही त्या नेत्यांची जागरूकता आहे.
मात्र, धोम, कोयनेसह सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीही जाणार, याचे भानही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही. यापूर्वी जिल्ह्यातील पाणी एक्सप्रेस कालव्याद्वारे इतर जिल्ह्यांमध्ये नेण्यात आले. त्यावेळीही आणि आताही लोकप्रतिनिधी पाण्याबाबत जागरूक नसल्याने जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील जनतेला वाली कोण, असा प्रश्न पडला आहे. झोपी गेलेल्याला उठवता येते; परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, तशी अवस्था आहे.
एरवी पाणीप्रश्नावर पोटतिडिकेने बोलणारे आणि भरभरून पत्रके प्रसिद्ध करणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत; पण योग्य वेळी पाण्याचे योग्य नियोजन न करण्यात मात्र सातारा जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये सातत्य राहिले आहे. आता तरी या नेत्यांनी जागे होऊन सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील पाणीप्रश्न नियोजनपूर्वक सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.