मुंबई – मराठी मनोरंजन विश्वाची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका ‘सुलोचना चव्हाण’ यांचं आज निधन झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
सुलोचना चव्हाण यांना 1965 साली “मल्हारी मार्तंड” या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.
सुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी:
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?