पारनेर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आ. नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत ,
काॅंग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रभारी अंकुश काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथर्डी येथील मोहटादेवी गडावर देवीला नारळ वाढवत या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा प्रारंभ एक एप्रिल रोजी होत आहे.
यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते व हितचिंतकांची रविवारी नियोजन बैठक घेत त्यांना यात्रेसंदर्भात मार्गदर्शन केले आहे. एक एप्रिल रोजी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथून नारळ वाढवून सुरुवात झालेल्या या यात्रेची 16 एप्रिल रोजी नगर येथील विशाल गणपतीच्या मंदिरात सांगता करणार आहेत.
या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी सकाळी नऊ वाजता पाथर्डी ते मोहटादेवी गडापर्यंत मोटरसायकल रॅलीचे नियोजन केले आहे. साडेनऊ वाजता मोहटा देवीचे दर्शन घेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत देवीला नारळ वाढवत यात्रेचा शुभारंभ करणार आहेत.
स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी केले आहे. संपूर्ण मतदारसंघात ही जनसंवाद यात्रा प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या समस्या व प्रलंबित कामांबद्दलचे विविध प्रश्न जाणून घेणार आहे. यात्रेच्या दिवसभराची सांगता करत त्याच गावात आ. लंके मुक्काम करत नागरिकांच्या समस्या जाणून घेत दुसऱ्या दिवशी पुढील गावांचा प्रवास करणार आहेत.