जळोची, {दिगंबर पडकर} – शरद पवार यांच्यापासून फारकत घेत महायुतीत दाखल झालेल्या अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीच्या मैदानात काका- पुतण्याचा राजकीय कस लागणार आहे.
महायुतीत भाजप व शिंदेच्या शिवसेनेची मोठी साथ अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असतील. बारामतीच्या या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांचाच राजकीय कस लागणार आहे.
गेली तीन टर्म खासदार सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांच्यापुढे घऱातूनच भावजय सुनेत्रा पवार यांच्या रुपाने बलाढ्य आव्हान उभे राहिले आहे. बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एकहाती अंमल आहे. गत निवडणुकीत बारामतीच्या जोरावरच सुळे विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांना येथे मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
इंदापूरमध्ये अजित पवार यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मदत घ्यावी लागेल. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचेच आहेत. शिवाय ते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे हे दोन बडे नेते एकत्र असतील तर इंदापूरात सुनेत्रा पवार यांना फारशी अडचण येणार नाही.
दौंडमध्ये तीच परिस्थिती आहे. आमदार राहूल कुल हे भाजपचे आहेत. शिवाय त्यांच्या पत्नी कांचन कुल यांचाच गत निवडणूकीत सुळे यांनी पराभव केला होता, ती सल त्यांच्या मनात असेल. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते रमेश थोरात व अन्य मंडळी अजित पवार यांच्या जवळची आहेत. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीचे पारडे जड राहिल. शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीची फारशी ताकद तेथे नाही.
बारामतीची लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होत असली तरी शरद पवार व अजित पवार यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे दोघेही आता कोणते डाव टाकतात, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
दीड महिन्यांपासून महायुती बॅकफूटवर
बारामतीच्या आखाड्यात अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर सर्व कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठीशी राहिल्याने अजित पवार हे एकाकी पडले. त्यातच नमो महारोजगार मेळावा झाला.
यात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोजन निमंत्रण दिले. यातून शरद पवार यांनी एकप्रकारे अजित पवार यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. श्रीनिवास पवार यांचा काटेवाडीतील व्हिडीओ व्हायरल झाला. या दीड महिन्यांतील घडामोडीवरून अजित पवार हे बॅकफूटला गेले असल्याचे दिसून आले.
शिवतारेंची मनधरणी पचनी नाही
पुरंदरचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बंड मोडीत काढत अजित पवार यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील बैठकीत अजित पवार यांची बॉडीलॅग्वेज बरेच काही सांगून गेली. त्यामुळे दगडाखाली हात सापडल्याने अजित पवार यांनी मनधरणी केली आहे. मात्र, ही मनधरणी फारशी पचनी पडली नसल्याचे दिसून आले.