मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले.त्याचे पडसाद आता उमटताना आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावाला भेट देऊन अंबड रुग्णालयात जखमींची विचारपूस करणार आहेत.
आज शरद पवार हे साडेअकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते साडेबारा वाजता अंबड रुग्णालयाला भेट देतील. तसेच वादीगोदरी हॉस्पिटलला देखील भेट देतील. यावेळी ते आंदोलनादरम्यान जे आंदोलक जखमी झाले आहेत, त्यांची विचारपूरस करणार आहेत. त्यानंतर शरद पवार हे आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिष होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाम झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने विरोध झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. तर गृहखात्याकडून घेतलेली भूमिका ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.