मुंबई – अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाचे महाराष्ट्रात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात शनिवारपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळपासून राज्यातील अनेक भागात पाऊस बरसत आहे.
मुंबई, पुण्यासह अनेक भागात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. यामुळे सकाळी कामावर निघालेले अनेकांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात पाऊस परतणार असून, पुढील 24 तासांसाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि सातारा या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, उद्या रविवारी देखील विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला. हवामान विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल तर पुढे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे.