वाल्हे: कोरोनाच्या संकटा विरुद्ध संपूर्ण जग लढा देत असतानाच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये अनेक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाळा जाणवत असताना. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर काही वेळाने गारांचा पाऊस सुरू झाला.
वाल्हे परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या शेतामधील काढलेले कांदे, भुईमूग, मका आदी पिके पावसामुळे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच आडाचीवाडी येथील अंजिर, शिताफळ, चिक्कू, आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच जनावरांचा ओला चारा मका, हात्ती घास, व्हंडी, मेथीघास आदी जनावरांच्या शेतामधील उभा चारा वादळी- वा-यांमुळे शेतामध्ये पडल्याने शेतकरीवर्गासमोर हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहेत.
वादळी वाऱ्यांमुळे महावितरणचे अनेक विद्युत खांब पडल्याने वाल्हे परिसरामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तसेच महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. खंडीत झालेला विद्युत पुरवठा रविवारी दुपारी सुरळीत करण्यात आला.
अवकाळी पावसामुळे अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अंजीराची अनेक झाडे मधूनच दुभागली असून अनेक फांद्या तुटून, अंजीर, शिताफळ, चिक्कू, लिंबू अशा प्रकारच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसत आहे. यामध्ये शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.