वाई – करोनाला थोपविण्यासाठी जाहिर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय महाराष्ट्रात अडकले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्याने या परप्रांतीयांचा आपआपल्या गावी जाण्याचा मार्ग नियम व अटींवर सोयीस्कर केला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्यांच्या सेवेसाठी काही प्रमाणात एसटी सेवादेखील सुरु करण्यात आली असून मंगळवारी वाई शहरातील परप्रांतीयांसाठी वाई आगाराची लालपरी धावली. एसटीने या कर्मचाऱ्यांना सातारा येथील रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात आले आहे. तेथून हे कर्मचारी रेल्वेने जाणार आहेत.
राज्यातील विविध जिल्हे, तालुक्यांप्रमाणेच वाई तालुक्यातील एमआयडीसी तसेच तालुक्याच्या विविध भागांमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या परराज्यातील मजूर गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी कामासाठी आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसायासह, रेल्वे, एसटीसेवादेखील बंद असल्याने हे मजूर याठिकाणीच अडकून पडले होते. त्यामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ आली होती.
आपापल्या गावी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. राज्यातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यभरात अडकलेल्या परप्रातीय मजुरांसाठी रेल्वे सेवा सुरु केली आहे. त्यासाठी या मजुरांची रितसर वैद्यकीय तपासणी करुनच परवानगी देण्यात येत आहे. वाईतील अडकलेल्या मजुरांनाही तशीच रितसर परवानगी मिळाली असून त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी बसेस काही प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मोजकेच प्रवासी घेऊन एसटीबस धावत आहे.
मंगळवारी वाई आगारातून सोडण्यात 14 बसेसमधून प्रत्येकी 22 या प्रमाणे 336 परप्रांतीयांना सातारा येथील रेल्वेस्थानकापर्यंत पोहचविण्यात आले आहे.
प्रवास करतेवेळी त्यांना पिण्याचे पाणी, एकवेळचे जेवण, मास्क व सॅनिटायझर सोय करून दिली होती, सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हे सर्व परप्रांतीय रवाना झाले, दररोज वेगवेगळ्या राज्यातील परप्रांतीयांना घराकडे पाठवण्यासाठी वाई आगाराच्या बसेस सोडण्यात येणार आहेत, त्याप्रमाणे बुधवारी उत्तर प्रदेशातील मजुरांना सातारा रेल्वे स्थानकावर पोचविण्यासाठी वाई आगाराची लालपरी धावणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान सकाळी पहिली गाडी रवाना करताना वाई आगार प्रमुख, वाई प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी व एसटी चालक-वाहक व कर्मचारी उपस्थित होते.