पुणे – टेकड्यांचे शहर असलेल्या पुण्याला नैसर्गिक तलावांचेही वरदान लाभले आहे. मात्र, शहराचा विस्तार होताना हे तलाव शहराच्या मध्यभागी आले आहेत. तलावांमध्ये थेट सांडपाणी सोडले जात असल्याने, ते प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे हे तलाव पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाच्या “अमृत मिशन-2′ मधून निधी मिळणार आहे. या निधीसाठी पालिकेकडून शहरातील पाच तलावांचे प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत.
शहराच्या चारही दिशांना जिवंत पाण्याचे झरे असलेले तलाव आहेत. या तलावांमध्ये वर्षभर पाणी असते. मात्र, दोन दशकांपूर्वी शहराच्या हद्दीवर असलेले हे तलाव आता शहरात आले असून, प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. परिणामी, जैवविविधताही नष्ट झालेली असून तलावात केवळ जलपर्णी वाढत आहे.त्यामुळे तलावातील माशांनाही धोका निर्माण झाला आहे. या परिसरात नेहमीच डासांचा उपद्रव वाढून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
हे तलाव होणार प्रदूषणमुक्त
कात्रज येथील दोन तलाव, पाषाण तलाव, जांभूळवाडी तलाव, हांडेवाडी-औताडेवाडी तलाव या पाच तलावांचा अमृत योजनेत समावेश केला आहे. यातलावांच्या सीमांना बांध घालणे, नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक विकसित करणे, तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी ड्रेनेज लाइन टाकणे, जलपर्णीची वाढ रोखणे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी अमृत योजनेत महापालिकेस निधी मिळण्याची अपेक्षा असून महापालिकेने 15 कोटींच्या निधी मागणी केल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी सांगितले.