फलटण – महापुराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच आहे. सध्या पूरपरिस्थिती ओसरली असली तरी आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगलीच्या स्वच्छतेसाठी फलटण नगरपालिका सरसावली असून पालिकेच्या आरोग्य व सफाई विभागातील 70 कर्मचारी मंगळवारी स्वच्छतेच्या साहित्यासह रवाना झाले आहेत.
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली भयानक पूरपरिस्थिती आता निवळली आहे. मात्र पाणी पसरलेल्या भागात रोगराई पसरु नये म्हणून जंतूनाशक फवारणी बरोबर परिसराची स्वच्छता करण्यासाठी फलटण नगरपालिकेच्या आरोग्य व सफाई विभागातील 70 कर्मचारी मंगळवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे स्वच्छतेच्या साहित्यासह रवाना झाले आहेत.पूर आलेल्या भागात चिखल, दलदल, मृत जनावरे, कुजलेल्या वस्तु यामुळे संसर्ग रोग व साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत रोगराई पसरु नये म्हणून शासनाने योग्य खबरदारी म्हणून पुराचा उपद्रव झाला नसलेल्या भागातील पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मदतीसाठी बोलवून घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फलटण नगरपालिकेने विनोद जाधव यांची टीम कोल्हापूर जिल्हात तर मनोज मारुडा यांच्या टिमची रवानगी आज सकाळी सांगलीकडे केली असल्याचे आरोग्य सभापती अजय माळवे यांनी सांगितले. अग्निशमन दल, सफाई कामगार तसेत आरोग्य खात्यातील कर्मचारी औषधे, जंतूनाशक, जंतूनाशक फवारणी यंत्रासह सकाळी रवाना झाले. मुख्याधिकारी प्रसाद काटकर तसेच नगराध्यक्षा नीता नेवसे व अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
रोग्य व सफाई विभागातील कर्मचारी सांगली व कोल्हापूर जिल्हातील पूरग्रस्त भागात स्वच्छता व सफाई सेवा करण्यासाठी गेल्यामुळे शहरातील स्वच्छतेत पुढील 5 दिवस त्रुटी राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.
सौ. निता नेवसे , नगराध्यक्षा, फलटण नगरपालिका.