राज्यपाल सत्यपाल मलिक यांची माहिती
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यापूर्वीच केंद्र सरकारकडून राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्बंध घातले होते. तसेच कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथील करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली.
15 ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आठवडाभरात किंना दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर यावरील निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.