तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळ्या
सातारा – शहर वपरिसरातील उपनगरांमध्ये कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करम्यात आली. तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर चंद्रग्रहण काळात साधकांनी जप अनुष्ठानाचा संकल्प साधला.
दरवर्षी शारदीय पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमेला अश्विनी साजरी केली जाते. घरातील ज्येष्ठ अपत्यास महिलांकडून औक्षण केले जाते. कोजागरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला. शहरातील राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरात कोजागरीनिमित्त नवचंडी याग झाला. सायंकाळी महिलांचा उत्सव या नात्याने नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील मंगळवार तळे परिसरातील ऐतिहासिक श्री तुळजाभवानी मंदिरात यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शेकडो पणत्या प्रज्वलित करून मंदिरातील गाभाऱ्यापुढे सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सातारा येथील स्थानिक कलाकार दीपक अविनाश भोईटे यांनी रेखाटलेली तुळजाभवानीची प्रतिमा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी रंगवली होती. अनेक भक्तांनी ही प्रतिमा आपल्या मोबाइलमध्ये कैद केली.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात तुळजाभवानीला विशेष फुलांचे गजरे, हार आणि अलंकार घालण्यात आले होते. येणाऱ्या सर्व भक्तांना मसाला दूध आणि खोबरा बर्फी प्रसाद म्हणून वितरण करण्यात आला. कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. अनेक युवक मंडळांनी मसाला दूध वितरणाचा कार्यक्रम केला. विविध गृह संकुलांच्या टेरेसवर दूध तसेच खाद्यपदार्थ मेजवानीचे आयोजन झाले. रात्री चंद्रप्रकाशामध्ये आटवलेल्या दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवून त्याची प्रतिमा चंद्राची दुधात पडल्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून देण्यात आले. शहरातील अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत कास रस्त्यावर यवतेश्वर घाटात बसून चंद्राचा देखावा डोळ्यात साठवत होते.
चंद्रग्रहणानिमित्त धार्मिक उपक्रम
कोजागरी पौर्णिमेला रात्री एक वाजून पाच मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होत असल्याने याचा कालावधी तब्बल दीड तासाचा होता. दोन वाजून 27 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपले. या ग्रहण काळात अनेक धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांनी संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर तसेच कराड येथील प्रीतीसंगमावर जपानुष्ठान केले तर अनेक भक्तांनी घरोघरी गुरुमंत्राचा जप करत विविध स्तोत्रे, धार्मिक गीते आणि पूजा विधी पार पाडल्या. ग्रहण संपल्यानंतर अनेकांनी स्नान करून देवाची पूजा केली.