शांतिनगरीचा राजा सुखसेन हा तसा सश्रद्ध धार्मिक आणि ईश्वरनिष्ठ. त्याच्या राज्यातली सारी प्रजा सुखी-समाधानी होती. प्रजेच्या मनात महाराज सुखसेन यांच्याबद्दल मोठा आदर होता. महाराज सुखसेन हे त्यांच्या नगरीतील सर्व साधूसंत, विद्वान आणि पंडित यांचा उचित आदर करीत. पण हे सारं करीत असताना कुठेतरी त्यांच्या मनात “मी’पणाचा अहंकाराचा गर्वाचा ताठा हा होताच. तो त्यांच्या कृतीतून दिसतही होता.
महाराज सुखसेन यांचा एक नित्य परिपाठ होता, देवपूजा झाली की राजवाड्याच्या गच्चीवर येऊन उभे राहात. त्यांच्या नित्याच्या नियमाप्रमाणे ते तिथूनच राजवाड्यासमोर जमलेल्या साधू, बैरागी, विद्वान आणि पंडित जनास नमस्कार करीत आणि मग ही त्या राजद्वारी उभी असलेली मंडळी त्यांना हात उंचावून आशीर्वाद देत असत.
आपल्याला या लोकांचा आशीर्वाद हा मिळायला हवा या हेतूनेच त्यांनी ते तसे रोजचे त्यांच्या भेटीचे आयोजनही घडवून आणलेले होते. साधुसंतांनी राजवाड्याच्या गच्चीत आलेल्या महाराजांचा नमस्कार स्वीकारायचा आणि त्यांना कल्याणमस्तु म्हणून आशीर्वाद द्यायचा हा जणू काही त्या नगरीतला एक अलिखित असा नियमच होता.
एक दिवस नेहमीप्रमाणे महाराज हे त्यांच्या गच्चीत आले. त्यांनी त्या उपस्थितत जनास नमस्कार केला. त्यांच्याकडून आशीर्वादाचे उंचावलेले हात पाहात असताना राजाच्या असे लक्षात आले की, त्या समुदायाच्या अग्रभागी एक साधू उभा आहे. इतरांचे हात आशीर्वादासह उंचावलेले आहेत. पण त्यांचा हात मात्र खालीच आहे. तेव्हा राजास मोठे आश्चर्य वाटले आणि काहीसा रागही आला. त्याने वरूनच त्या कृतीचा त्या साधूस जाब विचारला. त्यावर तो साधू गरजला आणि म्हणाला, “”राजन! तुला जर माझा आशीर्वादच हवा असेल तर तो असा वर उभा राहून मिळणार नाही. त्यासाठी तुला खाली उतरावे लागेल. जर तुला आशीर्वादाची गरज असेल तर तू खाली जमिनीवर उतर”
त्या साधूचे ते बोलणे ऐकले आणि त्या राजाचे साक्षी मन त्याला म्हणाले, “राजा! खाली उतर या आदेशाचा गुढार्थ लक्षात घे. जो अहंकाररहित होऊन संतचरणावर झुकतो तोच खऱ्या आशीर्वादास पात्र असतो. हेच त्यांना तुला सांगायचे आहे.’