टोलनाका हटाव कृती समितीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अल्टिमेटम : …अन्यथा तीव्र आंदोलन
कापूरहोळ -पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग कामाची अंतिम मुदत संपून तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तर झालेल्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, असे असतानाच पुणे-सातारा रस्त्यावरील प्रवास टोल भरूनही त्रासदायक होत असल्याने खेड शिवापूर टोलनाका चार दिवसांत बंद नाही केला तर तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाची असेल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना देण्यात आले.
शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या पुढाकराने लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी (दि. 22) पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेद देत वरील इशारा देण्यात आले. पुणे-सातारा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडून ऑक्टोबर 2010 मध्ये सुरू करण्यात आले होते. मुळ अडीच वर्षांच्या या कामाला वेळोवेळी मुदतवाढ देऊनाही नऊ वर्षांत हे काम अद्याप पूर्ण झाले नाही.
रस्त्यावरील खड्डे, सातत्याने होणारे अपघात, पुलांची व उड्डाणपुलांचे अपूर्ण कामे, सेवा रस्त्यांचे अपूर्ण कामे, नित्याची वाहतूककोंडी यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले असतानाही टोलवसुली जोमात सुरू असल्याने प्रवासी व नागरिक हैराण झाले आहे. निवेदन देण्यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, दत्ता धनकवडे, माउली दारवटकर, शैलेश सोनवणे, लहुनाना शेलार, अण्णा देशमाने, बाळासाहेब गरुड, शहाजी आरसुळ, सूर्यकांत भांडेपाटील, दिलीप बाठे, जीवन कोंडे, पोपट जगताप, दादासाहेब पवार, माउली पांगारे, हिरामण पांगारे, मलिक सैय्यद, अजिंक्य पोळेकर, सचिन बदक, गोरख मानकर उपस्थित होते.