इंडिया या विरोधी पक्षांच्या बैठकीत वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आले. त्यानुसार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल या नेत्यांना त्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यांत कॅप्टन बनवण्याचे सुचवण्यात आले. ममता आणि केजरीवाल यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी मांडलेला प्रस्ताव मंगळवारच्या बैठकीत मागे पडला.
दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध आहे का? असं विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलतांना म्हणाले, इंडिया आघाडी झालेल्या बैठकीत पंतप्रधान या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. काल उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह बैठक घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीआधीही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव आला. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात चर्चा होईल, मग निर्णय होईल.’ असेही राऊत म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला विरोध केलेला नाही. काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात, त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.