जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्वांसाठी सप्तसूत्री दिलेली आहे, जनतेने या सप्तसूत्रीचे पालन करावं, असं आवाहन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नागरिकांना केलं आहे.
आतापर्यंतचा अनुभव पाहता जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी कामे नसतानाही लोक बाहेर पडतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो, अशा स्वरुपामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या सप्तसूत्री लॉकडाऊन सूचनेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, त्यामुळे कोरोना पळवण्यासाठी आपल्याला यश येईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.