दिल्लीकरांनी नव्या पद्धतीच्या राजकारणाला बळ दिले – केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलिला मैदानावर हजारो लोकांच्या उपस्थितीत आज तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या समवेत त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यानंतर घेतलेल्या सभेत बोलताना केजरीवालांनी आपल्या सरकारच्या भावी कामकाजाचा रोख स्पष्ट केला. दिल्लीकरांचे आभार मानताना ते म्हणाले की आता देशात धर्म किंवा जातीचे नाही तर कामाचे राजकारण होईल आणि या कामाच्या राजकारणाच्या नव्या पद्धतीला दिल्लीकर जनतेने मोठे बळ दिले आहे.
ते म्हणाले की दिल्ली सरकारच्या विकासाच्या मॉडेलचे आज देभशर अनुकरण केले जात आहे.
आरोग्य, शिक्षण, या क्षेत्राकडे अधिक जागरूकतेने लक्ष दिले जात आहे. दिल्लीकरांनी ही राजकारणाला दिलेली नवीन दिशा आहे असे ते म्हणाले. प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूंकडून अनेक बाबी ऐकवल्या गेल्या. माझ्या विरोधातही अनेक आरोप केले पण आता माझ्या विरोधात आरोप करणाऱ्या सर्वांना मी माफ केले आहे.
आपण केंद्रातील मोदी सरकारच्या सहयोगाने काम करू इच्छितो असे नमूद करून त्यांनी केंद्राबरोबर संघर्षा ऐवजी सहकार्याची भूमिका घ्यायची तयारी दर्शवली असून केंद्र सरकारनेही तसाच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही केजरीवालांनी यावेळी व्यक्त केली.
मी दिल्लीत अनेक योजना मोफत दिल्याने माझ्यावर टीका सुरू झाली आहे असे नमूद करून ते म्हणाले की शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडून मी आता फी वसुल करू का? सरकारी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या गरीबांकडून मी पैसे घेऊ का? असे जर मी केले तर माझ्या इतका नालायक माणूस कोणी असू शकणार नाही अशा शब्दात त्यांनी मोफत सुविधांचे समर्थन केले.
या शपथविधीसाठी केजरीवालांनी सर्व दिल्लीकरांना वृत्तपत्रांत जाहीरात देऊन निमंत्रण दिले होते. त्याला हजारोंच्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला. हा दिल्ली केंद्रीतच कार्यक्रम असल्याने त्याला अन्य राजकीय पक्षांचे नेते किंवा अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे आम आदमी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
50 दिल्ली निर्मात्यांचा सन्मान
दिल्लीचा विकास आपण नव्हे तर सामान्य लोकांनी केला आहे असे नमूद करीत दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध घटकांमधील लोकांचा प्रातिनीधक सन्मान यावेळी करण्यात आला. 50 जणांना दिल्लीचे निर्माते म्हणून व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले होते.
यात शिक्षक, सुरक्षा जवान, आरोग्य क्षेत्रात योगदान देणारे कर्मचारी, शहीद जवानांचे कुटुंबिय, महिला मेट्रो चालक, अग्निशमन दलाचे जवान इत्यादी घटकांतील प्रतिनिधींचा समावेश होता. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर करण्याचा निर्धार या सर्वांच्या मदतीने आपण पुर्णत्वास नेऊ असेही केजरीवालांना यावेळी नमूद केले. भाषणाच शेवटी केजरीवालांनी हम होंगे कामयाब हे समुह गीत गायले त्याला उपस्थितांनीही जोरदार प्रतिसाद दिला. केजरीवांलासारखीच वेषभुषा करून आलेला बेबी मफलरमॅन या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला.