अरुण गोखले
साधारणपणे प्रत्येक गावाला एक नदी असतेच. किंबहुना जिथे नदी आहे त्या नदीच्या दोन्ही तीरांवरच गावे वसलेली असतात. मोठ्या प्रमाणात खळाळत वाहणारे पाणी म्हणजे नदी. ती नदी, तिचा काठ हा त्या गावाची संस्कृती सांगत आणि दाखवत असतो.
नदी म्हणजे उंच भागाकडून सखल भागाकडे वाहत येणारा मोठा प्रवाह. नदीचा उगम हा साधारणपणे डोंगर भागात झालेला असतो. उदा. हिमालयातून उत्तर भारतात वाहत येणारी गंगा नदी. त्र्यंबकेश्वराच्या डोंगरातून उगम पावलेली गौतमी अर्थात नाशिकची गोदावरी नदी.
नदी, तिचे काठ, त्या काठावरची पुरातन मठ मंदिरे, तेथील सिद्ध साधू सत्पुरुषांच्या समाध्या यामधून कळत नकळत त्या गावाचा इतिहास, संस्कृती, महती आणि श्रेष्ठत्व हे लक्षात येते.
देहू, आळंदी ही इंद्रायणी नदीच्या तीरावरची गावे. या गावांचा इतिहास, संस्कृती महत्त्वाची आहे. नदी वाहत असताना ती तिच्या दोन्ही काठांवरचा परिसर हा फळा-फुलांनी, धन धान्यांनी समृद्ध करीत जाते. नदीच्या पाण्यावर त्या गावातले व्यवसाय, शेती, उद्योगधंदे चालतात. त्यातून लोकांना रोजगार मिळतो आणि अशा रोजगारासाठी त्या गावात आलेले लोक ह्या नदीकाठी विसावले, राहायला लागले की आपोआप नदी जवळ गावे, शहरे उभी राहू लागतात.
नदी हे संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. कारण त्या नदीतील अखंड वाहणाऱ्या जल प्रवाहासारखीच तेथील लोकमानसातील श्रद्धा आणि भक्तिगंगा वाहत असते. चंद्रभागा नदी आणि तिच्या काठावरची पंढरी अर्थात भू वैकुंठ नगरी किंवा गंगे काठावरची पवित्र काशी ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत.
नदीची पूजा, जलपूजा हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. ती आपल्या धर्माची शिकवण आहे. हरिद्वार, काशी, गया, प्रयाग येथील नदीची संध्या आरती आणि नदी प्रवाहात दीप सोडण्याची प्रथा हे आपल्या संस्कृतीचे, सुसंस्काराचे आणि भक्तीचे दर्शन आहे. नदी आपले जीवन फक्त सुखवीत फुलवीत जात नाही तर ती आपल्याला काही सांगत आणि शिकवत असते. नदी सांगते, मी जसे तहानलेल्याची तहान भागविताना तो वाघ आहे का शेळी आहे, माझ्या पाण्याने स्नान करणारा पतित आहे की पुण्यवान आहे हे न पाहता सर्वांनाच समानतेने वागविते. त्यांच्या उपयोगी पडते तसे तुम्हीसुद्धा भेदाभेद न करता सर्वांशी समानतेने वागा, सर्वांशी प्रेमाने आणि आपलेपणाने वागा. सर्वांना सोबत घेऊन जा, हेच नदी शिकवून जात असते.