नवी दिल्ली – सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.
पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले. असं असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंजाब सरकारवर टीका केली. याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. तसेच पंतप्रधानांचा जीव धोक्यात आणण्यासाठी षडयंत्र करणाऱ्यांवर व सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’पंजाबमधील कालच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांची विधाने हा निर्लज्जतेचा कळस. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण देशाचा आशीर्वाद.
त्यांच्याविरुद्ध असे कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही !’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.