रामगढ : काश्मीर खोऱ्यातील जनतेचा मुक्तपणे वावर सुरू आहे. तिथे निर्बंध असल्याचा गवगवा करणाऱ्यांचे अस्तित्व दहशतवादावर अवलंबून आहे, अशी परखड भूमिका लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मांडली.
झारखंडच्या रामगढमध्ये आयोजित कार्यक्रमात रावत पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले नाही. लोक त्यांची नित्याची कामे करत आहेत. वीटभट्ट्यांचे काम सुरळीत सुरू आहे. ट्रक वाळू वाहतूक करत आहे. दुकानेही सुरू आहेत. त्यातून काश्मीर खोऱ्यातील जनजीवन सुरळीत असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचे धडक पाऊल भारताने उचल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यातून नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्या तणावाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे रावत यांनी टाळले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) मंगळवारी झालेल्या भूकंपाने लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.