निसर्गप्रेमींची कौटुंबिक सहलींना पसंती
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहराचा पश्चिम भाग निसर्गप्रेमींसाठी कायमच आर्कषणाचा क्रेंदबिंदू ठरला आहे. विशेषतः कास तलाव परिसर हा वर्षानुवर्षे पर्यटकांसाठी परिवार आणि मित्रांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी पहिली पसंती म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या कास तलाव परिसरात शनिवारी आणि रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी सातारकरांसह इतर ठिकाणचे पर्यटकही गर्दी करत आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठार, कास तलाव, बामणोलीचा शिवसागर जलाशय आणि काही वर्षांपासून नावारूपाला आलेला भांबवलीचा वजराई धबधबा ही स्थळे राज्यातीलच नव्हे तर देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालत आहेत. विशेषत: पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच बहरलेला असतो. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांना भेटी देतात. सध्या कास पठारावरील फुलांचा आणि वजराई धबधब्याचा पर्यटन हंगाम संपला असला तरी शिवसागर जलाशयातील बोटिंग आणि कास तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
चेक पोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवा
कास परिसरात येणाऱ्या काही अतिउत्साही लोकांकडून पर्यटनाला गालबोट लागू नये, याकरिता सांबरवाडी येथे पर्यटन हंगामात चेक पोस्ट सुरू असते. या चेक पोस्टवर पोलीस वाहनांची तपासण करतात. त्यामुळे दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी युवकांची टोळकी आणि प्रेमी युगुले कारवाईच्या धास्तीने माघारी फिरतात. पर्यटन हंगाम संपल्यावर शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी पोलीस वाहनांची तपासणी करतात; परंतु इतर दिवशी तेथे पोलीस नसतात. त्यामुळे मद्यपींचे आणि प्रेमी युगुलांचे फावते. त्यांना कायमस्वरूपी आवर घालण्यासाठीही चेक पोस्ट कायम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.