आळंदी -(एम. डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड) कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले. जिकडे तिकडे हरिनामाचा गजर होत आहे. इंद्रायणी घाटावर भक्तीचा महासागर ओसंडून वाहत आहे.
यावर्षी माऊलींच्या समाधीचे सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने आणि गेल्या वर्षी करोनामुळे वारी न झाल्याने असंख्य भाविक सोहळ्यासाठी आले आहेत. इंद्रायणी घाट, गोपाळपुरा, सिद्धबेट, वडगाव रस्ता, विश्रांतीवड परिसर, देहूफाटा, मरकळ रस्ता यासह संपूर्ण अलंकापुरीत भाविकांची मांदियाळी जमली आहे.
यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या निवासासाठी पाल, राहुट्या, धर्मशाळा, वारकरी आश्रम, वारकरी संस्था यामध्ये सोय केली आहे. भाविक इंद्रायणी तीर्थात स्नान करून माऊलींचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, 30 नोव्हेंबरला कार्तिक वद्य एकादशी आहे. या दिवशी 5 लाखांहून अधिक भाविक अलंकापुरीत असण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला माऊलींचा 725 वा संजीवन समाधी सोहळा होणार आहे.
माऊली मंदिरात दशमीला होणारे कार्यक्रम
पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4.30 ते 6.30 हभप गंगुकाका शिरवळकर यांच्यातर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा. सायंकाळी 6.30 ते 8.30 श्री धोंडोपंत दादा अत्रे यांच्यातर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा. रात्री 8.30 ते 9 धूपारती. रात्री 9 ते 11 हभप वासकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन, रात्री 11.30 ते 12.30 हभप वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे वीणा मंडपात जागर होणार आहे