खो-खो खेळात आजवर अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटविला आहे. यातच आता काजल भोर या खेळाडूने महाराष्ट्राच्या संघाचा कणा बनून देशपातळीवर आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याची ती वाट पाहात आहे.
वयाच्या सहाव्या वर्षांपासून वरिष्ठ खेळाडूंचा खेळ पाहून तिला या खेळाची गोडी लागली. तिने खो-खो खेळायला सुरुवात केली तेव्हा ती इतके यश मिळवेल, असे कोणालाही वाटले नाही. मात्र आज ती महाराष्ट्राच्या संघाचा कणा बनली आहे. आयुष्यातील पहिलीच स्पर्धा जिल्हा पातळीवर खेळताना तिने गोल्ड मेडल मिळविले आणि मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. आजवर एकूण चौदा राष्ट्रीय स्पर्धा खेळताना प्रत्येक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवत तिने आपल्या रांजणी या गावाचे नाव प्रसिद्ध केले. आजवर एकूण पंचवीस गोल्ड मेडल मिळवत तिने संदीप चव्हाण या आपल्या प्रशिक्षकांचाही विश्वास सार्थ ठरविला आहे. आज एफवायला असतानाही ती महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच खेळालाही प्राधान्य देत आहे. तिचे वडील शेतकरी असून तिला सहा बहिणी आहेत. त्यांच्या सगळ्यांचे विवाह झाले असून काजल सातवी आहे. एकीकडे शेतीची कामे आणि दुसरीकडे खेळ यांची उत्तम प्रकारे सांगड तिने घातली आहे.
वडिलांना शेतात मदत करतानाच ती शिक्षणाचीही कास धरून आहे. एकूण चौदा राष्ट्रीय स्पर्धा खेळताना तिने प्रत्येक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले आहे. अशी कामगिरी करणारी काजल राज्याची पहिलीच खेळाडू ठरली आहे. दीड एकर शेतीच्या उत्पनातून सुखी राहून खेळाकडे लक्ष देत तिने प्रो खो-खो लीगच्या सामन्यातही सुरेख कामगिरी केली आहे. लातूरला झालेल्या पहिल्याच स्पर्धेत तिने गोल्ड मेडलची कमाई करत उपस्थिताना आपली दखल घ्यायला लावली. नारायण गावमधील नरसे विद्यालयात शालेय शिक्षण आणि एसीएस महाविद्यालयात शिक्षण घेत तिने शिक्षण आणि खेळ यात बरोबरीने यश मिळविले आहे. 10 ऑक्टोबर 1999 रोजी तिचा जन्म अत्यंत हलाखीच्या कुटुंबात झाला. मात्र, या सगळ्या परिस्थितीवर मात करत आज ती भारतीय संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या काळात प्रो लीगच्या माध्यमातून तिला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार असून त्यातूनच राष्ट्रीय संघाची निवड होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे तिचे स्वप्न असून आज तिची कामगिरी पाहता ती नक्कीच यशस्वी होणार या बद्दल तिचे प्रशिक्षक संदीप चव्हाणदेखील ग्वाही देतात.
खुल्या गटात झालेल्या स्पर्धेत तिने गोल्ड मेडल जिंकत चमकदार कामगिरी करत गावाबरोबरच राज्याचे नाव झळकावले. घरच्या परिस्थितीबाबत कोणतीही तक्रार न करता खेळाच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि नरसिंह खो-खो क्लब यांच्याकडून खेळताना तिने कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. एकेकाळी तिच्यात आत्मविश्वास नव्हता, मात्र मोठ्या खेळाडूंना पाहून तिने या खेळाचे धडे गिरविले. पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळत तिने आत्मविश्वास मिळविला. तिच्या नरसिंह क्लबने राज्य खो-खो संघटनेशी संलग्नता मिळविली असून काजलला पुरेपूर पाठिंबा दिला आहे.
देशपातळीवरचे राणी लक्ष्मीबाई आणि अन्य दोन असे एकूण तीन पुरस्कार तिने मिळविले आहेत. वरिष्ठ स्पर्धेत तिने गोल्ड मेडल मिळवत राज्याचे नाव उंचावले आहे. आज राज्याच्या संघाचा ती कणा बनली असून राज्य संघात तिच्याशिवाय अन्य कोणाचेही नाव घेतले जात नाही. काजल अत्यंत प्रामाणिकपणे खेळाकडे लक्ष देत असून शिक्षणातही अग्रेसर आहे. बारावीच्या परीक्षेच्या वेळी तर तिने पेपरच्या आदल्या दिवशी राज्य स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मेडल मिळविले होते. आजवर एकूण पंचवीस वेगवेगळ्या स्पर्धा खेळताना तिने प्रत्येक स्पर्धेत गोल्ड मेडलची कमाई केली आहे.
आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव तिला असून हेच चित्र बदलण्यासाठी ती मेहनत घेत आहे. या खेळासाठी लागणारी तंदुरुस्ती तिला शेतीची कामे करताना मिळते आणि त्याचा उपयोग ती प्रामाणिकपणे करून घेते. संदीप चव्हाण हे नरसिंह क्लबचे मुख्य प्रशिक्षक असून हेच काजलला गेली आठ वर्षे प्रशिक्षण देत आहेत. त्यांचेही मत पाहिले तर काजलकडे ते भारताची प्रमुख खेळाडू म्हणून पाहात आहेत.
– अमित डोंगरे