मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे संयुक्तपणे सरकार आले आहे तेव्हापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या असणारे पक्ष एकत्र लढतील का ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच भाजपावर यावेळी गंभीर आरोप केले आहेत.
यवतमाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला तयावे ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.
सध्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूकि संदर्भात ते म्हणाले की, “या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती” असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.