नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही : ज्योतिषशास्त्र अभ्यासक
पुणे – “गुरू आणि शनी या दोन ग्रहांच्या झालेल्या युतीमुळे आगामी काळात चांगला बदल घडणार आहे. ही ऐतिहासिक घटना असून, नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नाही. यामुळे नवीन पर्वाची सुरूवात होणार आहे,’ असे मत ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केले.
गुरू आणि शनी ग्रहांच्या युतीमुळे भविष्य आणि पुढील वर्षातील घटनांवर नक्की काय परिणाम होतील, यासंदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर “भारताची रास मकर असल्याने, देशासाठी आगामी काळ चांगला आहे. प्रत्येक राशीला विविध घटकांत चांगला परिणाम जाणवेल. यामुळे उद्योगांना चालना मिळणार आहे. बेरोजगारी कमी होईल. यांसह सोने-चांदी, शेअर मार्केटचे दर खाली येतील,’ असे ज्योतिषशास्त्र अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले.
“मिथुन, कुंभ, तूळ, सिंह या राशींच्या अधिपत्याखालील राष्ट्रे आणि व्यक्तींना प्रतिकूल परिणाम दिसतील. तर काही राशींना हा काळ थोडा त्रासदायक ठरू शकतो. मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनू, मकर आणि मीन या राशींसाठी हा उत्तम काळ आहे. प्रत्येक राशीला वेगवेगळे घटकांबाबतचे परिणाम दिसतील. विशेषत: जानेवारीमध्ये प्रचिती येईल,’ असेही मारटकर म्हणाले.