साडेपाच कोटींची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
नीरा – नीरा -निंबूत (ता. पुरंदर) गावच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट कंपनीमुळे नीरा नदी, नाले व परिसरातील शेतजमिनी प्रदूषित झाल्या आहेत. या कंपनीकडून प्रदूषणाबाबत कोणत्याही पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे परखड मत राष्ट्रीय हरित लवादाने नोंदविले आहे, तसेच प्रदूषणाने बाधित शेतकरी व व्यक्तींना 5 कोटी 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. यापुढे कंपनीने उपाययोजना न केल्यास कंपनी बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
16 मे 2014 रोजी हरित लवादाने दिलेल्या आदेशाची कंपनीने पायमल्ली केली आहे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या अहवालानुसार सोडल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांची मर्यादा ओलांडली असून, नीरा व निंबूत परिसर प्रचंड प्रदूषित झाला आहे. कंपनीने यावर कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. या प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाईपासून कंपनीची सुटका नाही, असे मत न्या. आदर्श कुमार गोयल, न्या. एस. पी. वांगडी, न्या. डॉ. नागिन नंदा यांनी नोंदवले आहे. लवादाने नेमलेल्या समितीने कंपनीच्या परिसरात माती पाणी भूजल म्हणून घेतले. 1 जुलै 2019 ला अहवाल सादर केला आहे.
पर्यावरण समितीने पर्यावरणीय समितीचे उल्लंघन कंपनीने सुरू ठेवल्याचे समितीने नमूद करून 5 कोटी 47 लाख त्यांना देणे आवश्यक असल्याचेही मत नोंदविले आहे, त्यामुळे लवादाने ही रक्कम देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत, तसेच जिल्हा अधिकाऱ्यांनी चार जणांची समिती नेमून आणि तीन महिन्यांत दोन किलोमीटर परिघातील बाधितांना नुकसानीचे मूल्यांकन द्यावे व भूजल मंडळाच्या निकषानुसार पर्यावरणाची झालेली हानी तीन महिन्यांत दुरुस्ती करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
नीरा परिसरात असणाऱ्या या रासायनिक कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात नीरा नदी परिसर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देण्यात येत आहे. या समितीच्या आंदोलकांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली. सत्य मार्गाने जाणाऱ्या या नागरिकांना अनेक वेळा तुरुगांची हवा खावी लागली. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले. अगदी महिलाही यातून सुटल्या नाहीत. आजच्या या निकालाने आंदोलकांची भूमिका योग्य होती, हे अधोरेखित होते.
या लढ्यात स्थानिक आंदोलकांबरोबरच न्या. पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे पाटील, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, कॉ. सोनावणे यांसारख्या दिग्गजांबरोबर सचिन मोरे, राजेंद्र धुमाळ, वैभव कोंडे, संतोष मोहिते, शेखर पवार, हिंदुराव काकडे आदींसह अनेकांनी लढा दिला. त्यांना आता या निर्णयाने समाधान मिळाले असले तरी कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात लढ्याला पाठबळ मिळणार आहे.
ज्युबिलंट कंपनीने जमीन, हवा, पाणी प्रदूषित केल्याबद्दल लवादाने दंड केला असला तरी नीरा व परिसरातील लोकांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम झाला आहे, त्यामुळे जोपर्यंत कंपनीत असणारा ऍसिटिक अन्हायड्राइडसारखे प्लांट बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आंदोलक सचिन मोरे यांनी यावेळी सांगितले.
आमच्याकडे माहितीच आलेली नाही
ज्युबिलंट कंपनीमुळे नीरा नदी, नाले, परिसरातील शेतजमिनी व विहिरी प्रदूषित झाल्या आहेत, त्यामुळे प्रदूषणाने बाधित शेतकरी व व्यक्तींना 5 कोटी 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान ज्युबिलंट कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत अधिकृत माहिती आमच्याकडे आलेली नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.