रत्नागिरी ( Journalist Shashikant Warishe murder ) – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित होता, अशी कबुली आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने दिली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे हे पाहण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या आरोपी आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात शशिकांत वारिशे या पत्रकाराचा अपघात घडवून आणला होता. शशिकांत वारिशे यांच्या दुचाकीला सहा फेब्रुवारीला एका धरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याचा गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला.
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीसंदर्भात वारिशे यांनी बातमी दिली होती. ही बातमी एकप्रकारे नाणार रिफायनरीला प्रकल्पाला एकप्रकारे विरोध करणारी होती. त्यामुळेच वारिशे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे.
याप्रकरणी 8 फेब्रुवारीला पोलिसांनी संबंधीत वाहनचालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी काल संपली. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (विशेष शोधपथक) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा तपास पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.