इस्लामाबाद – जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने बोलावलेले संयुक्त अधिवेशन पहिल्याच दिवशी तहकूब करायला लागले आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या मतभेदामुळे भारताविरोधातील ठरावाची परिभाषा ठरवली जाऊ शकली नाही.
अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री आझम खान स्वाती यांनी भारतविरोधी ठराव मांडला. त्यामध्ये ताबारेषेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताचा निषेध करण्यात आला. मात्र त्यामध्ये राज्यघटनेतील 370 कलम रद्द करण्याचा उल्लेखच नव्हता. हा संदर्भ वगळण्यात आल्याबद्दल विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला आणि अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.
त्यामुळे सभापती असाद कैसर यांनी अधिवेशनच तहकूब करून टाकले. ठरावात दुरुस्ती करून नव्याने अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र या ठरावाच्या भाषेबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ न शकल्याने अधिवेशनाला पुन्हा सुरुवात होऊ शकली नाही.