नेत्यांना होत असलेल्या अटकेवर केली चिंता व्यक्त
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 मधल्या तरतुदी शिथिल केल्या. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजनही केले. या सर्व प्रकरणावरून पाकिस्तान प्रचंड संतापला आहे. तर, अमेरिकेने या प्रकरणावर सावध प्रतिक्रीया दिली आहे. अमेरिकेच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टेगस म्हणाल्या, आम्ही भारत आणि पाकिस्तानकडे एलओसीवर शांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्याचे आवाहन करत आहोत. जम्मू-काश्मीरच्या घटनाक्रमावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
जम्मू-काश्मीरला मिळणारे संवैधानिक अधिकार संपवण्याच्या भारताच्या घोषणेची आम्ही दखल घेतलेली आहे, असेही मॉर्गन ऑर्टेगस म्हणाल्या आहेत. त्याच बरोबर त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नेत्यांना होत असलेल्या अटकेवरही चिंता व्यक्त केली आहे. आम्ही भारताला आवाहन करतो की, भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखावा आणि संबंधित नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा. तसेच अमेरिकेने पाकिस्तानचा उल्लेख न करता नियंत्रण रेषेवर शांती ठेवावी, असेही म्हटले आहे.
भारत-पाकने संयम राखावा – युनो
भारताने काश्मिर साठी असलेली कलम 370ची तरतूद रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही या दोन्ही देशांना विनंती करतो की तुम्ही शांततेने हा मुद्दा सोडवावा असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे.