लंडन – दडपण, तणाव, संघिक कामगिरी तसेच वैयक्तिक कामगिरी आलेले अपयश व त्यामुळे होत असलेली टीका यांमुळे कंटाळून इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने ज्या कारणांनी भारताच्या संघाचे कर्णधारपद सोडले त्याच वाटेवर प्रवास करत रुटनेही ही जबाबदारी सोडली.
रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मानाच्या ऍशेस कसोटी मालिकेत 4-0 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांना 1-0 अशी गमवावी लागली. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रूटच्या नेतृत्वातील इंग्लंडचे स्थान सर्वात तळात 10 वे आहे.
रूटने 64 कसोटी सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले असून त्यात 27 सामने जिंकले तर 26 सामने गमावले आहेत. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला गेल्या 17 कसोटीत अवघा एकच सामना जिंकता आला आहे. संघाच्या या अत्यंत सुमार कामगिरीमुळे रूटवर सातत्याने टीका होत आहे.
2017 साली ऍलिस्टर कूकने इंग्लंडचे नेतृत्व सोडल्यावर रूटकडे ही जबाबदारी सोपवली गेली होती. त्याने खरेतर संघाला सातत्याने काही मालिकांत विजय प्राप्त करुन दिले मात्र, त्यानंतर संघाच्या यशाचा आलेख खालावला. 2018 सालच्या मालिकेत इंग्लंडने भारताचा 4-1 असा तर 2020 साली दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर संघाला या कामगिरीत सातत्य राखता आले नाही.