Jitendra Avhad Granted Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेत आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहायला आलेल्या एका प्रेक्षकास मारहाण केल्याचा देखील आरोप आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आला होता. अटकेनंतर आव्हाड यांना आज (शनिवारी) न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आव्हाड व त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या १५ कार्यकर्त्यांना सशर्त जमीन मंजूर केला.
दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर देखील आव्हाड यांची आक्रमक शैली कायम असल्याचं पाहायला मिळालं. जमीन मंजूर झाल्यानंतर याबाबत पहिलीच प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. आव्हाड लिहतात, “काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते! चाणक्यची नीती फसली जामीन जेवण दोन्ही मिळाले.”
आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये चाणक्य असा उल्लेख केला असून आपल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमागे चाणक्य असल्याचं सुचवलं आहे. तसेच जामीन मिळाल्याने चाणक्यची नीती फसली असा दावाही आव्हाडांनी केला आहे. आव्हाडांच्या ट्विटमधील चाणक्य कोण अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Jitendra Avhad Granted Bail )
काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते!#चाणक्य ची नीती फसली
जामीन जेवण दोन्ही मिळाले— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2022
राजकीय वातावरण तापलं
जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत भाष्य करताना, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. दुसरीकडे सत्ताधारी भाजप नेत्यांनी मात्र आव्हाड यांची अटक योग्यच असल्याचा दावा केला. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांवरून वाद
राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी, पुण्यात पत्रकारपरिषद घेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटांमधून चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत असल्याचा आरोप केला होता. यावेळी संभाजी राजे यांनी, मावळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा, ऐतिहासिक प्रसंग, चित्रपटातील संवाद यांवर आक्षेप घेतला होता. नुकताच प्रदर्शित झालेला हर हर महादेव व महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यांवर ताशेरे ओढले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरला होता.