पाकिस्तान हा देशच नव्हे तर त्यांचे क्रिकेट वर्तुळही इतक्या विनोदी पात्रांनी भरलेले आहे की काही विचारू नका. उदाहरणदाखल त्यांचा मंडळाचा माजी अध्यक्ष रमीझ राजा, शोएब अख्तर, अब्दुल रझाक, रशिद लतिफ, मोईन खान, शाहीद आफ्रिदी यांची ख्याती तर आपण सर्वच जाणतो. मात्र, त्यातही विनोदाचा बादशहा म्हणावा तो केवळ जावेद मियांदाद.
भारतीय संघ पाकिस्तानात आशिया करंडक खेळायला नाही आला तर जाऊ देत त्यांना नरकात, असे बोलून गेला. खरेतर तो काय बोलला हे समजायलाच बराच वेळ लागला कारण जावेद बोबडा आहे. त्यामुळे तो हे वाक्य कसे म्हणाला असेल याची कल्पना केली तरी हसु आवरत नाही. वो केलने नहीं आले तो जाने दो इनको नलक में. असेच काहीतरी बोलला असणार. (इथे हशा व टाळ्या).
भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय तणाव असल्याने भारतातील केंद्र सरकार भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी देणे शक्य नाही. या स्थितीत बीसीसीआयने हा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते असे पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या क्रिकेट मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष नजम सेठी यांनी व्यक्त केलेले मत.
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी आला नाही तर आमचा संघही भारतात यंदा होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. आता वस्तुस्थिती अशी आहे की जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला नाही तर त्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. परंतु त्यांचा संघ भारतात आला नाही तरी काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य निराशेतून व समोर तोटा दिसत असल्यामुळे आलेले आहे हे तर उघड आहे.
असो, प्रश्न जावेदचा आहे. हा माणुस प्रत्येक बाबतीत आपले मत व्यक्त करतो. त्यावर अद्याप बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अद्याप तो काय बोलला याची टोटलच बीसीसीआयला लागलेली नाही. (इथेही हशा व टाळ्या).
जावेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना एकदा एका भारतीय गोलंदाजाच्या चेंडूची दिशा भरकटावी यासाठी त्याला विचारत होता की, ए तेले लुम का नंबल क्या है. (तेरे हॉटेल के रुम का नंबर क्या है) यावर भारतीय क्रिकेटपटू भयंकर हसले होते व जावेद गप्पगार झाला होता. अर्थात यानंतरही त्याची अकारण बडबड करण्याची सवय गेली नाही हे मागेही अनेकदा दिसून आले आहे. आपल्या देशातही नाही का काही दिवसांनी आपल्या बातम्या येणे बंद झाले की काही लोकांना अकारण बडबड करण्याची व प्रसिद्धीत येण्याची सवय आहे तशीच जावेदलाही आहे. त्यामुळे त्याचे हे बोबडे बोल किती गांभीर्याने घ्यायचे ते सुज्ञास सांगणे न लागे. (अखेरचा हशा व टाळ्या).