विधानसभेत लक्षवेधी दरम्यान उपमुख्यमत्र्यांचे आश्वासन
पारगाव – जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार ऍड. राहुल कुल यांनी दिली.
आमदार कुल म्हणाले कि, पुणे जिल्ह्यातील दौंड, पुरंदर आणि बारामती या तिन्ही तालुक्याच्या दृष्टीने जानाई शिरसाई आणि पुरंदर या योजना जिरायती भागासाठी वरदान ठरत असून त्या गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. वरील तिनही तालुक्याच्या जिरायती भागातील पाणी प्रश्नावर आमदार कुल यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांवर अधिवेशन लक्षवेधी ठरले. दौंड तालुक्यातील ताम्हणवाडी, बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी अशी अनेक गावे ही दुष्काळी परिस्थितीचा सामाना करीत आहेत.
दौंड तालुक्याच्या उशाला जानाई शिरसाई व पुरंदर जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. मात्र या पाण्याचा दौंडच्या जनतेला आजपर्यंत निश्चित स्वरूपात फायदा झाला नाही. विधानसभेत आमदार कुल यांनी दौंड तालुक्यातील गावांना पाण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण विषय हाती घेऊन दुष्काळी गावांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार कुल यांनी केली आहे.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता 13835 हेक्टर आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता ही 25753 हेक्टर इतकी आहे. दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायम स्वरूपी दुष्काळी भागातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून या दोन्ही सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जनाई शिरसाई योजनेसाठी 3.60 टीएमसी तर पुरंदर योजनेसाठी 4 टीएमसी पाणी राखीव करण्यात येऊन देखील, पुरेशा प्रमाणात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात नाही. योजना सुरू होऊन पूर्ण क्षमतेने चालू नाही, योजनेसाठी करण्यात आलेल्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती असून, दौंडच्या दक्षिण भागातील अनेक गावे अध्यापही या पाण्यापासून वंचित असल्याचे विधानसभेत सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार करून दिलेले पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलाव यांची संख्या कमी असल्याने, त्या गावामधील काही समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याची व तलावांचे फेर सर्व्हेक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावर पाण्याची उपलब्धता पूर्णपणे तपासून घेऊन, सर्व योजनेचे फेर सर्वेक्षण करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जवळपास तीन टीएमसी पाणी वाचेल
मुळशीचे पाणी वळविण्यासाठी करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाची पडताळणी करून. लवकरच पाणी वळविण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुणे शहरातील बंद नळी कालव्याबाबत सुमारे अंदाजे येणारा खर्च 800 कोटींच्या आसपास आहे.त्या माध्यमातून समस्या सुटेल, जवळपास तीन टीएमसी पाणी वाचेल असा प्राथमिक अहवालात म्हटले आहे. पाच वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.