पिंपरी – महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या आहेत. अनेक तालुका, जिल्हा ठिकाणच्या संस्था उत्तम काम करतात. अलिकडे शिक्षण संस्थेत सुद्धा दोन भाग झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची म्हणून संस्था उभ्या केल्या आहेत. दुसरा एक वर्ग आहे, समाजाला उभारण्यासाठी, हातभार लावावा या हेतूने संस्था उभारणारा दुसरा वर्ग आहे. यामध्ये जैन समाजातील लोकांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ज्ञानदानाचे काम करण्याचे आपले कर्तव्य आहे. ते कर्तृत्व समजून जैन समाज काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
शिक्षण महर्षी स्व. शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांचा चिंचवड येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.21) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, शिरूरचे आमदार अशोक पवार, मंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद धारीवाल, उपाध्यक्ष देवीदास भन्साळी, वालचंद्र संचेती, झुंबरलाल चोपडा, राजेंद्रकुमार सुराणा, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, सरचिटणीस ऍड. राजेंद्रकुमार मुथा, कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा, सहायक सरचिटणीस प्रा. अनिलकुमार कांकरीया, राजेशकुमार सांकला यांच्यासह सर्व पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकारणी सदस्य तसेच सामाजिक, राजकीय, माजी विद्यार्थी व जैन समाजाचे नागरिक उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, देशाचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, शंकरदयाळ शर्मा यांनी या संस्थेला भेट दिली. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व क्षेत्रातील शाखा आहेत. आमच्या बारामतीच्या संस्थेत 30 हजार विद्यार्थी आहेत. देणगी आम्ही घेत नाही. रयत शिक्षण संस्थेत 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी हे रोपटे लावले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संस्थेच्या शाखा आहेत. संस्था चालविताना अनेक संकटे आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी अडचण आल्याने कर्मवारींच्या पत्नीने गळ्यातील मोडून पैसे उपलब्ध केले.
पवार पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना लातूरमधील किल्लारीला भूकंप झाला. सकाळी सात वाजता किल्लारीला पोहोचलो. एक लाखापेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली होती. मोठे संकट होते. या संकटाला लोकांनी मोठी मदत केली. कोणतेही संकट आल्यानंतर आपले कर्तव्य समजून महाराष्ट्रातील लोक पुढे येतात. त्यामध्ये जैन समाज कटाक्षाने पुढे येतो. यातूनच शांतीलाल मुथा यांनी भूकंपग्रस्तांच्या 1200 मुलांची जबाबदारी घेतली होती. ते सर्व जण आता विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
आयटीमधून 11 हजार कोटींची निर्यात
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान नगरीचे केंद्र झाले आहे. हिंजवडीला साखर कारखाना काढायचा होता. मी कारखान्याचे भूमिपूजन केले आणि भाषणात सांगितले येथे कारखाना होणार नाही. हिंजवडीऐवजी दुसरी जागा दिली. हिंजवडीत माहिती व तंत्रज्ञाननगरी काढली. आज हिंजवडीत गेल्यावर इंग्लंड, अमेरिकेत आल्याचा प्रत्यय येतो. एक लाख लोक तिथे काम करत आहेत. आयटीमधून दरवर्षी 11 हजार कोटींची निर्यात होत आहे. याचा पाया शैक्षणिक संस्थांनी घातला आहे. त्यामुळे शहराचा चेहरा बदलत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.