मुंबई – मुंबईतील शिवडी न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणीचा सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजूच्या सीटवर बसले होते. त्यावर राऊतांनी टीका केली आहे. तसेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर देखील भाष्य केले आहे.
राऊत म्हणाले की, ”नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही. मात्र त्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर बसवलं असं तुम्ही म्हणता. मग तो त्यांचा अधिकार आहे.”
पुढे ते म्हणाले की, “बाळासाहेबांनी कधीच कोणत्या व्यक्तीला विरोध केला नाही. फडणवीसंकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावे. बाळासाहेबांनी कधी गद्दारांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा मारून हाकलून द्या असं सांगितलं होतं. फडणवीस गद्दाराच्या गाड्या चालवत आहेत.”
तर दुसरीकडे, अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सापनाथ-नागनाथ सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. हा केवळ एक शब्दप्रयोग आहे. कितीही सापनाथ, नागनाथ एकत्र आले तरी ते मोदीजींना पराभूत करू शकणार नाहीत.
याला प्रत्युत्तर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, या देशात साप आणि नागांची पुजा केली जाते. त्यामुळे फडणवीसांच्या टीकेवर वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. यावेळी संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी परदेश दौरा करून आता भारतात आले आहेत. त्यांनी प्रथम राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटावे व उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना बोलवावे, असा सल्ला देखील दिला आहे.