दुबई – भारत व पाकिस्तान यांच्यातील सध्याचा तणाव पाहता या दोन संघात भारतात सामना होणे अत्यंत कठीण आहे. या सामन्यासाठी जगभरातील चाहते अतूर झालेले असतात मात्र, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अशा शब्दात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत मांडले आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात मालिका होणार का तसेच भारतात जर ही मालिका झाली तर पाकिस्तानचा संघ येणार का, असे काही प्रश्न गांगुलीला विचारले गेले त्यावेळी त्याने हा खुलासा केला आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी सामना सरु आहे. मात्र, या सामन्यासंदर्भात देशात सध्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असताना हा सामना होऊ नये, अशी देखील प्रतिक्रिया येत आहे. मात्र, हा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर असा सामना भारतात आयोजित करणे सध्यातरी फार कठीण आहे, गांगुली यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याने विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात काही पहिल्यांदाच होत आहे असे नाही. 2015 सालीदेखील भारत व पाकिस्तान सामन्याने सुरुवात झाली होती. 2019 साली ते शक्य होऊ शकले नाही. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात आणि अंतिम सामना पुन्हा पाकिस्तानसोबतच झाला.
भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, सगळ्यांवरच प्रचंड दडपण असल्याचे दिसून येते. लोक म्हणतात की भारत-पाकिस्तान सामन्याचे प्रचंड दडपण असते. पण मला ते कधीच जाणवले नाही. जेव्हा मी खेळत होतो, तेव्हाही मला ते जाणवले नाही. जेव्हा पहिल्यांदा मी बंगाल क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष झालो, तेव्हा 2016 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेतील या दोन संघातील सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झाला. एक आयोजक म्हणून तो माझा पहिला सामना होता, असेही गांगुली म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बोलताना गांगुलीने एक आयोजक म्हणून असलेले दडपण सांगितले. या खेळामध्ये लोकांना खूप रस आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रत्यक्ष दबावापेक्षा तो भारतात आयोजित करणे फार कठीण आहे. कारण इथे तिकिटांसाठी फार मागणी असते. भारतात या सामन्याकडे करोडो लोकांचे लक्ष असते. पण तसे इथे दुबईत दिसत नाही. त्यामुळे इथे हा सामना आयोजित करणे तुलनेने सोपे आहे, असेही गांगुलीने सांगितले.
आत्तापर्यंत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान 5 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानचा पाचही वेळा पराभव केला आहे. फक्त 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी विराट कोहली कर्णधार होता.