मुंबई – राफेल खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला हे सर्वांचे स्पष्ट मत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या व्यवहाराला क्लीन चीट मिळाल्याची भूमिका केंद्राने घेतली. पण ज्याप्रकारे फ्रान्समधून एकापाठोपाठ एक माहिती बाहेर येत आहे तसेच इंडोनेशिया सोबत फ्रान्सचा नवा राफेल करार झालाय त्यातून स्पष्ट झाले आहे की, इंडोनेशियाला ज्या दरात अधिक राफेल विमाने मिळाली, त्या दरात भारताला कमी राफेल विमाने मिळाली आहेत.
त्यामुळेच भारताच्या राफेल खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र केंद्र सरकार हे स्वीकारायला तयार नाही. आगामी काळात यातील सत्य नक्कीच बाहेर येईल. केंद्रात सत्ता असल्यामुळे यात फार काही होणार नाही, मात्र भविष्यात सत्ता बदल झाल्यानंतर सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला.