नवी दिल्ली – भाजप नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिल्याने भाजपने अयोग्य मार्ग वापरून महापौरपदाची निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट होते आहे असे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, भाजपच्या नवनियुक्ती महापौरांनी राजीनामा दिला आहे याचा अर्थ तर तिथे काहीतरी संशयास्पद आहे हे अगदी उघड आहे. यावरून त्यांनी अन्याय्य मार्गाने निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट होते. अशाच प्रकारे ते इतर निवडणुकाही जिंकतात; जर ते जिंकले नाहीत तर ते विजयी पक्षाकडून नेते विकत घेतात. निवडणुका अन्यायकारकपणे जिंकल्या गेल्या तर लोकशाही देश कसा चालेल? असा सवाल केजरीवाल यांनी केला.
दरम्यान सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेहा, पूनम आणि गुरचरण काला या तीन नगरसेवकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांना धमकाऊन किंवा विकत घेऊन फोडण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या इच्छेने भाजपमध्ये सामील झाले आहेत आपने त्या नेत्यांना खोटी आश्वासने दिली असा आरोप त्यांनी केला. जेव्हाही नव्याने महापौरपदाची निवडणूक होईल तेव्हा पक्ष बदलणारे तीन आप नगरसेवक भाजपच्या बाजूने मतदान करतील असे ते म्हणाले.