मुंबई – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काही खेळाडूंनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांना सामना रकमेच्या काही टक्के दंडही करण्यात आला आहे. मात्र, बीसीसीआय तसेच सामनाधिकारी ही कारवाई करतात, खेळाडू त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतात. मात्र, नंतरही त्यांच्याकडून अशीच शिस्तभंग झाल्याच्या घटना घडतात. हे थांबले पाहिजे व पहिल्याच चुकीवर कठोर कारवाई करण्यात आली तरच खेळाडूंवर जरब बसेल, असे मत बीसीसीआयच्या एका माजी सदस्याने व्यक्त केले आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल व अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोनिस यांच्यावर याच गैरवर्तनामुळे कारवाई केली गेली आहे. मात्र, भविष्यात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी कायमची उपाययोजना केली गेली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, आयपीएल-2022मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत क्रीजवर उपस्थित फलंदाजांना परत बोलावण्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी शार्दुल ठाकूरनेही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक एक पाऊल पुढे टाकत कर्णधाराच्या सांगण्यावरून मैदानात जाऊन अंपायरशी वाद घालताना दिसले. या सर्व वादानंतर आता सर्व सदस्यांना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने शिक्षा ठोठावली आहे.
ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण आमरे यांना आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. प्रवीण आमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे पंतला सामन्याच्या शुल्काच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर एका सामन्याची बंदीदेखील ठोठावण्यात आली आहे. आमरे यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 2 चा गुन्हा स्वीकारला आहे.