मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात दोन नवे संघ दाखल झाले आहेत. यातील अहमदाबादचा संघ सीव्हीसी समूहाने खरेदी केला आहे. मात्र, हा समूह ऑनलाइन बेटिंग व जुगार या प्रकारांशी जोडला गेल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयचे धाबे दणाणले आहे. याची खातरजमा करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे.
दुबईत बीसीसीआयने या लिलावाचे आयोजन केले होते. त्यात लखनौ संघाची मालकी संजीव गोयंका यांच्या समुहाकडे गेली तर सीव्हीसी समूहाने अहमदाबादचा संघ खरेदी केला होता.
मात्र, एका मासिकाच्या हवाल्याने हा समूह काही चुकूच्या गोष्टींशी संबंधीत असल्याचे समोर आल्यानंतर आता बीसीसीआय काय निर्णय घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोयंका यांच्या आरपीएसजी समूहाने लखनौचा संघ तब्बल 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला. तर, सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ 5 हजार 600 कोटी रुपयांना खरेदी केला.
सीव्हीसी कॅपिटलने बेटींग आणि जुगार कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली उघडकीस आलेल्या बेटींग आणि फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलची यापूर्वीच बदनामी झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सापडल्यामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ बेटींग आणि जुगारातील उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या कंपनीला आयपीएल स्पर्धेतील संघ देण्यात आल्याने बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकाराला भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. आयपीएलचे माजी संचालक ललित मोदींनी देखील या विषयावर ट्विट करत बीसीसीआयवर टीका केली आहे.
बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष
सीव्हीसी कॅपिटल इंग्लंडमधील इनव्हेस्टमेंट फर्म आहे. या कंपनीने नुकतेच ला लिगामध्ये 10 टक्के मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. याशिवाय फॉर्म्युला वन आणि रग्बी टीमही सीव्हीसी कॅपिटलच्या नावावर आहे.अहमदाबादच्या टीमसाठी अदानी ग्रुपने 5 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, पण सीव्हीसी कॅपिटलने जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लावल्यामुळे त्यांनाअहमदाबादचा संघ घेता आला. आता याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार हे लवकरच जाहीर केले जाणार आहे.