जयपूर -राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. या सामन्यात जे नाट्य घडले त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणत्या क्षणी काय होईल हेदेखील कोणाला सांगता येणार नाही असेच चित्र दिसले.
रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी 5 धावांची गरज होती. अब्दुल समदला या धावा करता आल्या नाहीत व राजस्थान 4 धावांनी जिंकल्याचे चित्र निर्माण झाले.
मात्र, पंचांनी शर्माचा हा चेंडू नोबॉल असल्याचे जाहीर केले व 11 वाजून 8 मिनिटांनी समदने शर्माच्या चेंडूवर षटकार फटकावला व हैदराबादने हा सामना 4 गडी राखून जिंकला.
हा चेंडू नोबॉल असल्याने फ्री हीटच होती व त्यावर फलंदाज बाद होणारच नव्हता आणि समदने उंचावरून फटका खेळला व चेंडू मैदानाबाहेर भिरकावून दिला आणि हैदराबादच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
राजस्थानने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेतला होता; मात्र रिप्लेमध्ये शर्माने ओव्हरस्टेप केल्याचे स्पष्ट दिसले आणि राजस्थान संघाचा हिरमोड झाला.
हैदराबादने द्विशतकी धावांचा पाठलाग करत जिंकलेला आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा पहिलाच सामना ठरला. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले असेच या सामन्याचे वर्णन करावे लागेल.