पुणे – उद्धव ठाकरे यांना शेताचा बांधच माहिती नाही. त्यांना माहित असता बांध फुटला असता का? 40 आमदार व 13 खासदार वाहून गेले असते का, बांध माहिती असता तर ठाकरे यांची अशी अवस्था झाली नसती, अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
पुणे येथे कृषीमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्याचे कृषीमंत्री शेताच्या बांधावर जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली होती.
त्या टीकेला सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “”मी ठाकरे यांना सोडून आलो हे त्यांनी पाहिलेच नाही. मी जितका फिरलो तितका कोणताही कृषीमंत्री राज्यात फिरलेला नाही. मात्र, त्यांचे दुखणे वेगळे आहे. ते कधी जातच नाही.’
न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करू
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित असून, त्यामुळे सत्ताधारी पक्षांत धाकधूक असल्याचे बोलले जात आहे. यावर कृषीमंत्री सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, “धाकधूक त्यांनाच आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आहे ते आमदारही निघून जाण्याची भीती आहे. त्यांचे लोक मुख्यमंत्र्यांची चर्चा करत आहेत. त्याचे परिणाम निकालानंतर दिसतील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला स्वीकार्य राहील. त्याचा सन्मान करू.