मुंबई – कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात विजयी घोडदौड करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथे हा सामना खेळविण्यात येत आहे.
दिल्लीच्या संघाने यंदा कात टाकल्याचे चित्र असले तरीही त्यांच्याकडे सातत्याचा अभाव दिसत आहे. या सामन्यात बलाढ्य मुंबईच्या अत्यंत भेदक गोलंदाजाचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या सामन्यात अफलातून फलंदाजीचे दर्शन घडवले होते. मात्र, त्यानंतर त्यांना यश आलेले नाही.
मुंबईचा संघ परिपूर्ण वाटतो. कर्णधार रोहित शर्माचे अफलातून नेतृत्व त्यांना सातत्याने विजयी मार्गावर नेत आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी व रोहितचे निर्णय संघाच्या फायद्याचेच ठरत आहेत. फलंदाजी तर भक्कम आहेच पण गोलंदाजीतही त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत.