– स्वप्निल श्रोत्री
आपल्याच राष्ट्रातून आपल्याला कोणी बाहेर काढणे हे कोणत्याही राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या पचनी पडण्यासारखे नाही. त्यामुळे इस्रायल, हमास किंवा अरब वादावर तोडगा म्हणजे द्विराष्ट्राचा सिद्धांत हा आहे.
7 ऑक्टोबर रोजी अरब-इस्रायल युद्धाला झालेल्या पन्नास वर्षांच्या निमित्ताने पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या “हमास’ या संघटनेने इस्रायलवर अनपेक्षितपणे व अतिशय आक्रमक हल्ला करून आजही आपण पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्यासाठी लढत असल्याचे दाखवून दिले.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष जगाला नवीन नाही. किंबहुना गेल्या 75 वर्षांपासून अरब जगताचे राजकारण हे याच दोन देशांभोवती फिरत असल्याचे दिसून आले आहे. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या भूमीचा घेतलेला ताबा ज्या काही संघटनांना मान्य नाही आणि ज्या संघटना इस्रायलचे अस्तित्वच मानायला तयार नाहीत अशा संघटनांपैकी एक म्हणजे “हमास’ होय. दुसरीकडे इस्रायल या युद्धाला “हमास’च्या हल्ल्याचे नाव देत असला तरीही 1948 ते 2023 या काळात इस्रायलने पॅलेस्टाइनची जवळपास सर्वच जमीन लाटली आहे, त्यामुळे तेथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या पॅलिस्टिनी नागरिकांमध्ये इस्रायल विरोधातील रोष हा युद्धाच्या रूपाने बाहेर पडत आहे.
जगाची दोन गटांत विभागणी
अरब-इस्रायल युद्धाच्या वेळी जी परिस्थिती होती ती आता नाही. इस्रायल नावाचे एक स्वतंत्र राष्ट्र आहे हे बहारीन, यूएई, सौदी अरेबिया यांसारखी राष्ट्रे मानायला लागली आहेत. त्यामुळे इस्रायलला पश्चिम जगताबरोबरच काही अरब राष्ट्रांचा जरी पाठिंबा असला तर हमास-इस्रायल युद्धाला धार्मिक रंग देऊन तुर्कीयेसारखी काही राष्ट्रे “हमास’च्या मागे उभी राहिल्याचे दिसून येत आहे. “हमास’ला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांमध्ये तुर्कीये, इराण, इजिप्त, सुदान यांचा समावेश होतो, तर इस्रायलला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि इतर पाश्चिमात्य देशांचा समावेश होतो. रशिया, कॅनडा, चीन ही राष्ट्रे उघडपणे नसली तरी छुप्या पद्धतीने “हमास’ला पाठिंबा देताना दिसून आली आहेत. थोडक्यात, इस्रायल-हमास युद्धाच्या निमित्ताने जगाची पुन्हा एकदा दोन गटांत विभागणी झाल्याचे दिसून येते.
रशिया-युक्रे न युद्धावर परिणाम होणार?
रशियन आक्रमणापुढे लढणाऱ्या युक्रेनची संपूर्ण भिस्त ही अमेरिका आणि पश्चिमेकडील राष्ट्रांकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीवर अवलंबून आहे; परंतु युक्रेन विरोधात एक युद्ध सुरू असताना हमासने इस्रायल विरोधात युद्धाची दुसरी आघाडी उघडल्यामुळे अमेरिकेचे व पाश्चिमात्य राष्ट्रांचे संपूर्ण लक्ष युक्रेनवरून इस्रायलकडे केंद्रित झाले. परिणामी, पश्चिमेकडून युक्रेनला मिळणाऱ्या मदतीत येणाऱ्या काळात घट झाल्याचे दिसून येईल आणि त्याचाच फायदा घेत रशिया पुढील काळात युक्रेनवर जोरदार हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताची भूमिका
इस्रायल आणि पॅलेस्टाइन संदर्भात भारताच्या दोन वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आहेत.1948 ते 1991 पर्यंत भारत पॅलेस्टाइनच्या अधिकाराचे समर्थन करताना दिसला, तर 1991 पासून भारत आणि इस्रायल यांच्यात हळूहळू द्विपक्षीय संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली. 2014 पासून भारताने आपला पूर्वीच्या भूमिकेला छेद देत उघडपणे इस्रायलचे समर्थन सुरू केले. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला; परंतु त्याचवेळी ते बाजूला असलेल्या पॅलेस्टाइनमध्ये गेले नाहीत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी भारत इस्रायलच्या जनतेबरोबर असल्याचे जाहीर केले. पण असे करीत असताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत दोन्ही पक्षांना वाद मिटवण्याचे आवाहन केले. म्हणजेच, इस्रायल आणि पॅलेस्टाइनबाबत भारताने बुद्धाचा मार्ग जरी स्वीकारला असला, तरी भारत हा इस्रायलच्या बाजूने अधिक झुकल्याचे दिसून येते. माणुसकीच्या नात्याने भारताने पॅलेस्टाइनला मदतही पाठवली आहे.
युद्धाचा शेवट होणे अशक्य!
हमास-इस्रायल युद्ध हे जितके सरळ वाटते तितके ते सरळ नाही. इस्रायलचे अस्तित्वच नाकारणाऱ्या हमासला जर पॅलेस्टाइन राष्ट्राची निर्मिती करायची असेल, तर इस्रायल सैन्याचा सपशेल पराभव करणे आवश्यक आहे आणि वास्तविक पाहता हे हमासला शक्य नाही. आजच्या तारखेला इस्रायल हा शक्तिशाली देश आहे. जगातील 17व्या क्रमांकाची शक्तिशाली सेना इस्रायलकडे आहे. तसेच अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रांचे समर्थन इस्रायलला असल्यामुळे इस्रायलचा युद्धात पराभव करणे हमाससाठी अशक्य आहे.
दुसरीकडे हमास ही दहशतवादी संघटना वाटते तितकी दुबळी नाही. 1987 पासून इस्रायलच्या लष्कराशी लढण्याचा त्यांचा अनुभव आहे. इराण आणि सुन्नीबहूल राष्ट्रांकडून हमासला रसद पुरविली जाते. परिणामी, हमासचा पराभव करणे इस्रायलच्या लष्करासाठी सोपे नाही.
ज्या गाझापट्टीवरून हमासने इस्रायलवर हल्ला केला आहे. त्या गाझापट्टीवर जरी हमासचे नियंत्रण असले तरी गाझापट्टीची हवाई आणि सागरी हद्द इस्रायलच्या लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे गाझापट्टीमध्ये कोण येणार, कोण जाणार याचे नियंत्रण इस्रायलच्या लष्कराकडून होते. परिणामी हमास आणि त्यांच्या समर्थकांनी गाझापट्टीमध्ये ठिकठिकाणी जमिनीखाली भुयारांची निर्मिती केली आहे. हमासचे भुयारांचे जाळे हे इतके विस्तारलेले आणि किचकट आहे की, हमासच्या प्रमुख लोकांशिवाय इतर कोणालाही ते समजणार नाही. याच भुयारी मार्गांच्या माध्यमातून हत्यारांची आणि अमली पदार्थांची तस्करी करणे, दहशतवाद्यांची ने-आण करणे, इस्रायलच्या लष्करावर हल्ले करून पळून जाणे अशी कामे हमासकडून केली जातात. 2014 मध्ये गाझापट्टीत प्रवेश केल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने हमासची भुयारे नष्ट केल्याचा दावा केला होता. परंतु, काही दिवसांतच हमासने चित्रफित जारी करून 95 टक्के भुयारे शाबूत असल्याचे सांगितले होते.
आखातीत युद्ध भडकण्याची शक्यता
इस्रायलच्या प्रमुख वृत्तपत्रांनी आणि इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्यांनी हमासच्या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीसुद्धा या युद्धासाठी इराणला जबाबदार ठरविले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वैर काही जगाला नवीन नाही. अरब जगतातील अनेक सुन्नीबहूल भागात इराणचे दहशतवादी गट कार्यरत आहेत. त्यामुळे कदाचित इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेली शाब्दिक चकमक जर लष्करी चकमकीत बदलली तर त्याचे दूरगामी परिणाम हे जागतिक राजकारण व अर्थकारणावर पडणार आहेत.
द्विराष्ट्र सिद्धांत हा एकमेव शांततेचा मार्ग
इस्रायल आणि हमास युद्धाचे मूळ इस्रायलने पॅलेस्टाइनची जमीन बाळकाविणे हे आहे. आपल्याच राष्ट्रातून आपल्याला कोणी बाहेर काढणे हे पचनी पडण्यासारखे नाही, त्यामुळे इस्रायल, हमास किंवा अरब वादावर तोडगा म्हणजे द्विराष्ट्राचा सिद्धांत. विवादित जमिनीचे दोन भागात विभाजन करून एक भाग पॅलेस्टाइनचा तर दुसरा भाग इस्रायलचा घोषित केला तर युद्धाचा शेवट होऊन मध्य पूर्वेत शांतता नांदू शकते. कोणाला किती आणि कोठे जागा मिळणार हा तांत्रिक मुद्दा जरी असला तरी टेबलावर बसून सोडविता येऊ शकतो.
युद्ध हे कोणत्याही समस्येवर उत्तर नाही. युद्धात अपरिमित जीवित व वित्तहानी होते. देश अनेक वर्षे मागे फेकला जातो. या सर्वात भरडली जाते ती सर्वसामान्य जनता, ज्यांचा या युद्धाशी कसलाही संबंध नसतो. म्हणून या युद्धाचा शेवट होणे शांततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.