अहमदाबाद – शिक्षणासाठी परदेशी जाणे एवढे सोपे नसते. त्यासाठी कर्ज काढावे लागते आणि मग परदेशीतील शिक्षण, कर्ज, त्यावरील व्याज हे सगळे ओझे बनते. असे असले तरी गुजरातमधील एका भागात तुम्हाला परदेशी जाण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज मिळते तेही शून्य टक्क व्याजदराने आणि ते पैसे परत करण्याच्या कोणत्याही दडपणाविना. तुम्ही कायदेशीररित्या स्थलांतरित होत आहात किंवा नाही याचा विचार न करता आणि हप्ते भरण्याची कुठल्याही सक्तीशिवाय हे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे कर्ज घेतलेल्यांपैकी बहुतेकजण ते परत करतात आणि दामदुपटीने परत करतात हे विशेष.
गांधीनगर जिल्ह्यातील कालोल नावाच्या छोट्या शहरातील 21 वर्षाच्या अंकित पटेल या तरुणाला अमेरिकेला जाण्याची इच्छा होती, परंतु त्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची त्याची ऐपत नव्हती. मग त्याने परदेशी शिक्षणासाठी तरुणांना आर्थिक मदत करणाऱ्या समाजाच्या ट्रस्टकडे धाव घेतली. एका आठवड्यात त्याला लागणाऱ्या पैशाची व्यवस्था झाली आणि अमेरिकेला जाण्याचे अंकितचे स्वप्न साकार झाले.
एकदा का तो अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यात स्थिरस्थावर झाला की, ट्रस्टकडून घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट रक्कम परत करणार आहे. त्यासाठी त्याच्यावर कोणतेही दडपण, दबाव किंवा सक्ती नसते तर समाजाशी असलेली बांधिलकी आणि समाजाने त्याला अडचणीच्या काळात केलेली मदत याबद्दलची कृतज्ञता म्हणून शिक्षणानंतर नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर तो मदतीची रक्कम दुपटीने परत करणार असतो.
गुजरातच्या उत्तर आणि मध्य भागात असे अनेक ट्रस्ट काम करतात. त्यामुळे या भागाला डॉलरियो प्रदेश असेही म्हटले जाते. हे ट्रस्ट तरुण-तरुणींना परदेशात शिक्षणासाठी आणि स्थिरस्थावर होण्यासाठी आर्थिक मदत करतात. या ट्रस्टचे कामकाज अनौपचारिकपणे चालते आणि हे ट्रस्ट साधारणपणे स्थानिक जाती-समाजांकडून चालवले जातात. कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरीत होत असताना बर्फवृष्टीमुळे गोठून कॅनडाच्या सीमेवर एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
हे कुटुंब गांधीनगर जिल्ह्यातील कालोल तालुक्यातील दिनगुछा गावातील होते. त्यानंतर या गावाला प्रसिद्धी मिळाली. दिनगुछामधील 42 वर्षीय भाविन पटेल यांच्या मते गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एकजण अमेरिका, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की, प्रत्येक कुटुंबाकडे त्यांच्या घरातील तरुणांना परदेशी पाठवण्यासाठी पैसा असतोच. त्यामुळे आमच्या गावात ट्रस्ट आहे. आम्ही परदेशी जाणाऱ्यांना मदत करण्यासाठीच पैसे गोळा करतो.
वेगवेगळ्या कारणांमुळे परदेशात स्थायिक होण्यासाठी व्यक्तीला 15 ते 30 लाख रुपयांची गरज असते. अशा व्यक्तीला ट्रस्टतर्फे शून्य टक्के व्याजाने आवश्यक तेवढी रक्कम दिली जाते. ती रक्कम परत करण्यासाठी कुठलेही हप्ते बांधून दिलेले नसतात. एकदा का ती व्यक्ती परदेशात स्थायिक झाली की, तिने घेतलेली रक्कम स्वतःहून ट्रस्टकडे परत केली जाते. अनेकजण घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत करतात. मेहसाणा जिल्ह्यातील कदी या गावात अरविंद पटेलही असाच ट्रस्ट चालवतात. त्यांनी गेल्या वर्षभरात 15 जणांना परदेशी जाण्यासाठी मदत दिलेली आहे. ते सांगतात की, आर्थिक विवंचनेमुळे परदेशी जाण्यासाठी लोक झगडत असल्याचे, संघर्ष करत असल्याचे आम्ही पाहिले तेव्हा त्यासाठी आम्ही एक अनौपचारिक ट्रस्ट तयार केला. त्यामध्ये समाजातील लोकांनी निधी जमा केला.
हा पैसा तरुणांना परदेशी जाण्यसाठी मदत करण्याच्या दृष्टीन वापरला जातो. त्यातून परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना बिनव्याजी पैसे दिले जातात. एकदा का ते तिथे स्थिरस्थावर झाले की ते कर्जाऊ घेतलेली रक्कम परत करतात. आजपर्यंत पैसे बुडवण्याची एकही घटना घडलेली नाही, असेही ते आत्मविश्वासाने सांगतात. ते म्हणतात, वर्षभरात आम्ही 15 जणांना अमेरिकेला जाण्यासाठी एकूण अडीच कोटी रुपयांची मदत केलेली आहे. त्यांनी आता तीन कोटी रुपये परत केले आहेत. आम्ही ही रक्कम अन्य तरुणांचे परदेशी जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वापरणार आहोत.