“स्वाभिमानी’चे भीमाशंकर कारखान्यासमोर आंदोलन
मंचर/पारगाव शिंगवे – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अंतिम हप्ता 300 रुपये ऊस उत्पादकांना तातडीने द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी शनिवार (दि. 26) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव, दत्तात्रय नगर (ता. आंबेगाव) येथे दिला
भीमाशंकर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी खर्डा-भाकर खाऊन तीनशे रुपये अंतिम हप्ता मिळाला पाहिजे, यासाठी आंदोलन केले.
आंदोलनामध्ये पांडुरंग निकम, संतोष गोपाळे, प्रकाश कोळेकर, वनाजी बांगर, संतोष पवार, मंगेश बोराडे, सूर्यकांत वाघ, सुधीर वाघ, गणेश दौंड, विवेक टेमकर, वैभव टेमकर, महादू भोर, दीपक शिंदे, रामकृष्ण भोर, तुकाराम गावडे, नवनाथ पोखरकर, संदेश पोखरकर, नवनाथ पाचारणे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. भीमाशंकर साखर कारखाना आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दरवाढ देण्याबाबत नेहमीच उदासीन भूमिका घेतली आहे. प्रभाकर बांगर म्हणाले, जिल्ह्यासह राज्यातील विविध साखर कारखाने शेतकऱ्याना चांगला दर देत आहे.
अंतिम दर देण्याबाबत “भीमाशंकर’ने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल. यावेळी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच विविध घोषणा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थिताचे लक्ष वेधले.
वर्षभर ऑडिट किंवा इतर बाबींची पूर्तता झाल्यानंतर ऊस दराबाबत अंतिम निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला जातो, तसेच एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट दिले आहे. जिल्ह्यातील किंवा राज्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपीनुसार पेमेंट केलेले नाही. शेतकऱ्यांच्या ऊस बिलाबाबत योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका “भीमाशंकर’ची आहे.
– बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना