सातारा – राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा पाचवा टप्पा 2021 पासून सुरू झाला. मात्र प्रभावी संसाधने वापराच्या नावाखाली राज्यातील 191 एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर सरकार आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांना टाळे लागल्यास जिल्ह्यातील 38 कर्मचारी बेकार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी योग्य समायोजन न झाल्यास 3 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार हे केंद्र बंद करून येथील कर्मचाऱ्यांना इतर पदांच्या एचआयव्ही सुविधा केंद्रांमध्ये हस्तांतरित केले जाईल असे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत सांगितले जात आहे. देशातील 2219 केंद्र बंद झाल्यावर जवळपास चार हजार कर्मचारी स्थलांतरित करण्याच्या नावाखाली बेकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन 2002 ते 2006 या कालावधीत टप्प्याटप्प्याने 21 एकात्मिक समुपदेशन केंद्र सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. त्यापैकी जिल्ह्यातील तीन केंद्र याच नियमानुसार सप्टेंबर 2019 मध्ये बंद करण्यात आली आहेत.
सध्या कार्यरत असणाऱ्या 18 केंद्रांपैकी तीन केंद्र बंद होण्याच्या स्थितीत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण वीस समुपदेशक, 18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे 38 कर्मचारी आहेत. सातारा जिल्ह्यात 2002 ते 2023 या कालावधीत 21 लाख 17 हजार 601 एचआयव्ही तपासण्या करून 22 हजार 219 एचआयव्ही संसर्गितांना शोधून त्यांना एआरटी उपचार देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले होते. यापैकी 10 हजार 950 एचआयव्ही संसर्गित व्यक्ती सातारा जिल्ह्यातील शासकीय एआरटी केंद्रांमध्ये तर पाच हजार एचआयव्ही संसर्गित व्यक्ती इतर जिल्ह्यातील शासकीय एआरटी केंद्रामध्ये उपचार घेत आहेत, असे असताना एकात्मिक समुपदेशन केंद्र बंद करण्याचा झालेला निर्णय हा आश्चर्यचकीत करणारा आहे, अशा प्रतिक्रिया संबंधित कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत.
राज्यातील 382 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 80 कर्मचाऱ्यांचे समायोजन रिक्त पदांवर दिले जाऊ शकते. उर्वरित 302 कर्मचाऱ्यांना कोठे समायोजित करणार याचे उत्तर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडे नाही. त्यामुळे हे केंद्र बंद करण्यापूर्वी राष्ट्रीय व राज्य एड्स नियंत्रण संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा सक्षम आराखडा तयार करणे गरजेचे आहे. मात्र हा आराखडा अस्तित्वात येताना दिसत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जिल्ह्यातील 38 कर्मचारी बेकार होणार असल्याने राज्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी संदर्भात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी येत्या तीन ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.