मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अनेक दिवसांच्या मौनानंतर गेल्या राजीनामा दिला होता. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड याच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्याकडे सोपविला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी आज मोठा निर्णय घेतला आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सही केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर संजय राठोड अडचणीत आले होते. त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. तसेच काही ऑडियो क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे राठोड यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यातच पूजाच्या मृत्यूनंतर राठोड १५ दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
दरम्यान राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे का पाठवला नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. तसेच राठोड यांच्याकडून राजीनामा रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर सही केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजतं.